Home » » अभयारण्यातील भयकंप!

अभयारण्यातील भयकंप!

व्याघ्रदर्शनाचे प्रवेशद्वार म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या विदर्भाच्या भूमीत सध्या वाघांना ठार करण्याचे मनसुबे यशस्वी होत आहेत. देशातील वाघांच्या घटत्या संख्येबाबत व्यक्त होणारी चिंता नवी नाही. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील वाघांचे मृत्यूही नवे नाहीत. परवा झालेल्या वाघाच्या शिकारीची पद्धत मात्र नवी आणि निर्दयीही आहे. पूर्ण वाढ झालेल्या पट्टेदार वाघाचे उभे-आडवे १० काप बघून वनकर्मचारी हादरले आहेत.

विदर्भातील विपुल वनसंपत्ती हा आज फक्त अभिमानाचा विषय राहिलेला नाही. फोफावणाऱ्या नक्षलवादाच्या कितीतरी जखमा जंगलात दडल्या आहेत. प्राण्यांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या टोळ्या ही याच जंगलाची अलीकडे पुढे येणारी काळी बाजू आहे. परवाची वाघाची शिकार विजेचा शॉक देऊन केली, असा संशय आहे. वाघाचे शिर व हात-पाय पळवून नेताना चोरट्यांनी या वाघाला चिरून काढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाघाचे मोल माहीत असलेल्यांकडून असे होणे शक्य नाही. अभयारण्यात भुरट्या चोरांचा मुक्त संचार सुरू असल्याच्या बातम्यांना बळ देणारी ही परिस्थिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गेल्या २० दिवसांत झालेली वाघाची ही दुसरी शिकार आहे. या परिसराने सहा महिन्यांत सात वाघांचा मृत्यू अनुभवला आहे. याआधी झालेल्या वाघाच्या शिकारीचा तपास करण्यासाठी आलेल्या सत्यशोधक समितीवर आता नव्या शिकारींचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कडेकोट बंदोबस्ताचा दावा करणाऱ्या यंत्रणेपेक्षाही चोरट्यांची नजर भेदक असल्याची प्रचीती या निष्ठुर शिकारीने दिली आहे.

भारतात दिवसाला एका वाघाची तस्करी होते, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वनविभागाने हा दावा खोडला असला, तरी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेशातील तस्करी थांबलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. औषधसामग्रीसाठीच वाघांच्या अवयवांची तस्करी होते असेही नाही. वेगवेगळ्या अंधश्रद्धांनीही या तस्करीला मोठा हातभार लावला आहे. मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा व्याघ्रप्रकल्पातून बरीच 'कमाई' केल्यानंतर आता शिकारी टोळ्यांनी महाराष्ट्रा-तील जंगलांकडे मोर्चा वळविला आहे. संशयाची सुई मध्य प्रदेशातील बहेलिया शिकाऱ्यां-कडे वळत असली, तरी नवखे चोरटेही जंगलप्रदेशात सक्रिय आहेत. जंगलात पाण्याचा अभाव असल्यामुळे वाघांना संरक्षित क्षेत्राबाहेर पडावे लागते. शिकाऱ्यांकडे वाघाचाही मार्ग बदलविण्याचे कसब असते. वाघांचे मृत्यू त्यातूनच वाढले आहेत. अनेक संघटनांनी जंगलात पाणी पुरविण्याचे काम हाती घेतले आहे; पण वाघाला जाळ्यात अडकविण्या-साठी नवे जलसाठे उभे करण्याचे कारस्थानही जंगलाआड सुरू असते. जंगलात मुरणाऱ्या या पाण्याचे स्त्रोत शोधणे खरंच कठीण आहे काय? या प्रश्नाचे उतर अनेक सत्यशोधन समित्यांनाही मिळालेले नाही.

नागपूरला 'वाघपूर' म्हणून घोषित करण्याची मागणी अलीकडे वाढते आहे. व्याघ्रप्रकल्पांचे महाद्वार म्हणून नागपूरला महत्त्व द्यावे, अशा आशयाचे फलकही उपराजधानीने मिरवून घेतले आहेत. वाघदर्शनाची हमी देऊन पर्यटकांचा ओघ ताडोबा, मेळघाट, पेंचकडे वळविला जातो. पर्यटन प्रोत्साहनाच्या नावाखाली आनंदोत्सवही साजरा होतो. पण शहरातील उमाळा आणि जंगलातील वेदना यांचा मेळ कोण घालणार? खरेतर, वनसंरक्षणासाठी येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा ताळेबंद मागण्याची ही वेळ आहे. आज देशातील १७ राज्यांमध्ये ४१ व्याघ्र-प्रकल्प आहेत. त्यात १७०६ वाघ आहेत. गेल्या सहा महिन्यांत देशभरात ३२ वाघांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ, वाघांविषयी कणव दाटून येत असतानाच वाघमृत्यूचे प्रमाणही वाढते आहे. मुख्य म्हणजे, ३२पैकी १५ वाघांची शिकार झाली आहे. वाघांचे अपमृत्यू महाराष्ट्रासाठी अधिक चटका लावणारे आहेत. भुरटे म्हटले तरी खाणार, आणि तस्कर म्हटले तरी खाणार अशा कचाट्यात वाघोबाच आता अडकले आहेत. राज्यातील चार टायगर प्रोजेक्टपैकी तीन विदर्भात आहेत. विदर्भातील संरक्षित क्षेत्राबाहेर किमान १०० वाघांचा वावर आहे. संरक्षित क्षेत्राबाहेरील वाघांचा वाढता वावर प्राणिमित्रांच्या चिंतेतही भर घालणारा आहे. एकंदरित, अभयारण्यातील भयकंप अधिकाधिक गडद होत असल्याचे वास्तव ताडोबातील शिकारीने उघड केले आहे. तस्करांच्या भीतीने 'डरकाळी' थिजून जाऊ नये, यासाठी वनखात्यानेच आता वाघाची हिंमत दाखवायला हवी

Source 
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger